मुंबई: राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाल्यानंतर पक्षात “नवं पर्व” सुरू झाल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत, “नवं पर्व सुरू झालं म्हणत असाल, तरी ‘अजित पर्व’ कधीच संपणार नाही,” असा दावा केला.
“एफआयआर नोंदवण्यासाठी मदत करा”
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही नेते त्यांच्यावर “इव्हेंट” केल्याचा आरोप करत आहेत. “तुम्ही सत्तेत आहात. एफआयआर नोंदवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मी विरोधात असल्यामुळे माझा एफआयआर घेतला जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. राजकारण बाजूला ठेवून किमान तक्रार नोंदवण्यासाठी तरी सहकार्य करा,” असे आवाहन त्यांनी केले.
“लोकांच्या मनात दादांप्रती प्रेम कायम”
रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, “जनतेच्या मनात दादांबद्दल अपार प्रेम आहे. त्यामुळे ‘अजित पर्व’ संपणार नाही. घटनेबाबत अनेक शंका आहेत. न्याय मिळवायचा असेल, तर आजच ठोस पावले उचलली पाहिजेत.” त्यांनी नाव न घेता तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका केल्याचे मानले जाते.
नियंत्रणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया
“काहींना वाटत असेल की पूर्वी नियंत्रण शक्य नव्हते, पण आता शक्य होईल—तर तो त्यांचा गैरसमज आहे,” असे सूचक वक्तव्य करत रोहित पवार यांनी कुटुंबीयांनीही सावध राहावे, असे म्हटले.
शरद पवारांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण
दरम्यान, शरद पवार यांच्या निवेदनावरून सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “जनतेत तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जबाबदारीची भूमिका घेतली. ते भावनिक अवस्थेत होते, म्हणून काही मुद्दे लिहून देण्यात आले आणि त्यांनी ते वाचले. त्या भूमिकेचे राजकारण करणे योग्य नाही.”राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये या वक्तव्यांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.