बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे जात असताना विमानाला तांत्रिक बिघाड होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज महिन्यानिमित्त जय पवार, पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांनी स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरेंनी भावनिक शब्दांत दादांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सखोल चौकशीची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
तटकरेंनी सांगितले की, राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून तपास प्रक्रिया सुरू आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले असून केंद्रीय स्तरावरही पत्रव्यवहार झाल्याचे त्यांनी नमूद केले. “दादांच्या निधनाने आम्ही सर्वजण व्यथित आहोत. सर्व बाजूंनी तपास व्हावा, ही आमची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काही राजकीय वक्तव्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. “दादांच्या पार्थिवाजवळ असतानाच काही जण विलीनीकरणाची भाषा करत होते. २०१९ मध्ये कोण तिकीटासाठी कुठे गेले होते, याची माहिती दादांकडे आणि माझ्याकडे आहे,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
तसेच, दादांनंतर कुटुंबीयांनी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सध्या तपासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.