नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडलेल्या एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा पोलिसांनी उलगडा केला असून या प्रकरणामागे कौटुंबिक व प्रेमसंबंधातील वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय शादाब तांबोळी यांच्या मृत्यूमागे त्यांची पत्नी मुस्कान तांबोळी हिच्यासह काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी शादाब घरातील काही वस्तू आणण्यासाठी बाहेर गेले होते; मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर तपास सुरू असतानाच 22 फेब्रुवारीला चांदवड परिसरातील परसूल नदीच्या पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर लोखंडी डंबेल्स बांधलेले असल्यामुळे तो पाण्यात बुडून राहावा असा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
तपासात उघड झाला कथित कट
निफाड पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि संबंधितांच्या हालचालींचा मागोवा घेतला असता या प्रकरणातील धागेदोरे मिळाले. तपासादरम्यान मुस्कान तांबोळी हिचे मनमाड येथील ऋषभ वर्मा या तरुणाशी संबंध असल्याची माहिती समोर आली. या संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
आमिष दाखवून बोलावल्याचा आरोप
तपासात पुढे असेही समोर आले की, सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचे आमिष दाखवून शादाब यांना मनमाड-मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले. तेथे त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाला लोखंडी वजनं बांधून नदीत टाकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
सात जण अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी मुस्कान तांबोळी, ऋषभ मनोज वर्मा, शाहरूख शेख यांच्यासह एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींमध्ये युवराज थोरात, सलीम साबीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल आणि शेख एजाज शेख रियाज यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.