मुंबई : राज्यातील अनेक रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत उपस्थित झाला. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी हा प्रश्न उपस्थित करत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले.
लोणीकर यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील विठ्ठल कदम या शेतकऱ्याला बायपास शस्त्रक्रियेसाठी योजनेचा पूर्ण लाभ मिळत नाही. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्र लागू असताना बायपास शस्त्रक्रियेसाठी सुमारे ६ लाख रुपयांपर्यंत मदत मिळायला हवी. मात्र संबंधित रुग्णालयाकडून केवळ १ लाख रुपयांचीच मंजुरी दिली जात असल्याने दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया रखडली असल्याची तक्रार त्यांनी सभागृहात मांडली.
या मुद्द्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील या योजनांअंतर्गत बायपाससह अनेक मोठ्या शस्त्रक्रियांसाठी ठराविक दर निश्चित केलेले आहेत. आयुष्मान भारत योजना जोडल्यामुळे उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र रुग्णांकडून शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क घेण्याची गरज नाही.
तसेच जर एखादे रुग्णालय रुग्णांकडून पैसे मागत असेल किंवा योजनेचे नियम पाळत नसेल, तर त्याची माहिती द्यावी. अशा रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आबिटकर यांनी दिला.यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमार्फत या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी लोकप्रतिनिधींना केले.