पुणे : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असताना हवामानात अचानक बदल झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा या भागांत वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचे सावट पुन्हा एकदा राज्यावर गडद झाले आहे.
सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले असून, अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. सायंकाळच्या वेळेस गारवा जाणवत असल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या बदलत्या हवामानामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीटही होण्याची शक्यता आहे. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान या पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
या परिस्थितीत काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके आणि फळबागांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, २१ मार्चनंतर हवामान पुन्हा स्थिर होण्याची शक्यता असून तापमानात वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढू शकतो.मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानात बदल जाणवत असून, २० मार्चच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सावधगिरीचा इशारा:
मेघगर्जना आणि विजांच्या वेळी नागरिकांनी उघड्या जागेत थांबणे टाळावे. झाडाखाली, वीज खांबाजवळ किंवा ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात उभे राहू नये. तसेच पाळीव जनावरांचीही योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.