पुणे : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरात याच्यासारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते, असे वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी केले. त्या मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. अशा प्रकारच्या गंभीर आरोपांमध्ये कुणालाही राजकीय पाठबळ मिळू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. विकृत कृत्य करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
सुळे यांनी सांगितले की, नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात उभा केलेला लढा महत्त्वाचा होता आणि त्यांच्या विचारांची दिशा आजही आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे त्या विचारांना पुढे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या प्रगतिशील प्रतिमेला धक्का बसल्याची खंत व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, समाज म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. महिलांना अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते, ही चिंतेची बाब आहे. भविष्यात सार्वजनिक व्यक्तींनी कोणासोबत संबंध ठेवताना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, अनेक वेळा नेत्यांना संबंधित व्यक्तींची पूर्ण माहिती नसते. मात्र, पुढील काळात अशा बाबींमध्ये अधिक जबाबदारीने वागावे लागेल.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळावरही सुळे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, ही घटना लोकशाहीसाठी घातक असून तिचा निषेध करणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.