पुणे : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक व्यासंगी संशोधक, प्रगल्भ विचारवंत आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व गमावले आहे.
डॉ. पवार यांनी डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधनास प्रारंभ केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. मराठेशाहीच्या इतिहासाचा सखोल मागोवा घेणारे ते एक मान्यवर अभ्यासक होते.
त्यांनी २५ पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथांची निर्मिती केली असून ‘पंचगंगेच्या तीरावरुन’ हे त्यांचे आत्मकथन विशेष गाजले. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांनी इतिहास सामान्य माणूस आणि अभ्यासक या दोघांनाही समजेल अशा सोप्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडला.
इतिहास संशोधनातील त्यांच्या योगदानामुळे मराठेशाहीचा इतिहास अधिक तपशीलवार आणि सुस्पष्टपणे पुढे आला. त्यांनी ४५हून अधिक शोधनिबंध विविध परिषदांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये सादर केले. तसेच अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले.ते अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद चे संस्थापक सदस्य होते आणि पुढे तीन वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना करून इतिहास जागृतीचे कार्य केले. यशवंतराव चव्हाण सेंटर च्या विविध उपक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.त्यांच्या निधनामुळे इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कन्या मंजूश्रीताई आणि कुटुंबियांसोबत सर्वांच्या संवेदना व्यक्त होत आहेत.
डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.