पुणे : राज्यात हवामानात अचानक बदल होत असून अवकाळी पावसाने अनेक भागांना झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील काही भागांत दुपारी जोरदार सरी कोसळल्या. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली, तर काही ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार सरी
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर बाणेर, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत पावसाचा जोर इतका होता की रस्त्यांवर पाणी साचले. पिंपरी-चिंचवडमध्येही सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या या सरींमुळे रस्त्यावर असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
विदर्भात शेतकऱ्यांची चिंता वाढली
दरम्यान, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा परिणाम जाणवला. विशेषतः रिसोड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा, आंबा, भाजीपाला आणि इतर फळबागांना या पावसामुळे नुकसान होऊ शकते. कापणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गारपिटीसह वादळी वाऱ्यांचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत राज्यातील अनेक भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागांत मेघगर्जनेसह पाऊस, ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.