सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात शुक्रवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. मुंबईहून माळशिरसकडे जाणारी कार नीरा उजव्या कालव्यावरील पुलावरून थेट पाण्यात कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे चार ते पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली कालव्यात पडली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
या दुर्घटनेत आई-वडील आणि त्यांची विवाहित मुलगी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जावई गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.