पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताबदल निश्चित झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आज सकाळी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. ही बैठक त्यांच्या कार्यकाळातील शेवटची ठरली. यानंतर बिहारमध्ये नवीन नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.
दरम्यान, नितीश कुमार यांनी अलीकडेच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 10 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती. यामुळे त्यांनी केंद्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ते बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री होणार आहेत.
विशेष म्हणजे, सम्राट चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी नितीश कुमार यांना सत्तेतून हटवण्याचा संकल्प केला होता. तोच संकल्प आता पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.बिहारमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू असून लवकरच नवीन मंत्रिमंडळाची घोषणा होण्याची शक्यता आहे.