नाशिक : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने पोलीस भरतीसाठी मोठ्या मेहनतीने तयारी केली होती. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिला आवश्यक गुणांपेक्षा दोन गुणांनी कमी मिळाल्याने तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. या धक्क्यामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती.
शनिवारी सकाळच्या सुमारास तिच्या राहत्या घरी हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना कळवले असून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संबंधित तरुणी मेहनती आणि जिद्दी स्वभावाची असल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, अत्यंत कमी फरकाने आलेल्या अपयशाने ती खचली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.ही घटना स्पर्धा परीक्षांच्या तणावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.