कल्याण: कल्याण परिसरात मानवी संवेदनांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. वालधुनी येथील अशोक नगर भागात एका महिलेवर आणि तिच्या भावावर सासरच्या मंडळींकडून चाकू व दगडाने हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, 12 एप्रिल 2026 रोजी कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि घटस्फोटासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांची बैठक झाली होती. मात्र, चर्चेदरम्यान वाद चिघळला आणि दोन्ही बाजूंमध्ये तीव्र भांडण झाले. घरात सुरू झालेला वाद पुढे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.
तक्रार नोंदवण्यासाठी रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम हे महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपींनी भररस्त्यात त्यांच्यावर अचानक हल्ला केला. पती, सासरा, दीर आणि नणंद यांनी मिळून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत बहीण-भाऊ पोलीस ठाण्यात आश्रयासाठी धावत गेले, तर आरोपी त्यांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचले.या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या शरीरावर 8 ते 10 टाके पडले आहेत. अस्लमची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी पती तन्वीर खान याला अटक केली आहे. त्याच्यावर पूर्वीपासून गुन्हे दाखल असून हद्दपारीची कारवाईही झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.