मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची तातडीची बैठक घेत विविध संवेदनशील प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस महासंचालक, तसेच संबंधित विभागांचे उच्चाधिकारी उपस्थित होते.
खरात प्रकरणात ठोस पुरावे गोळा करण्याच्या सूचना
नाशिकमधील बहुचर्चित खरात प्रकरणाबाबत बोलताना फडणवीस यांनी पीडितांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तपासात कोणतीही ढिलाई न ठेवता न्यायालयीन प्रक्रियेत केस मजबूत होईल अशा पद्धतीने ठोस पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात आला. दोषींना कडक शिक्षा होईल याची खात्री करण्यासाठी तपास अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नाशिक धर्मांतर प्रकरणाचा सर्वांगीण तपास करण्याचे आदेश
नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित धर्मांतर प्रकरणाची गंभीर दखल घेत, या प्रकरणातील प्रत्येक शक्य पैलू तपासण्याचे आदेश देण्यात आले. कोणताही तपशील दुर्लक्षित राहू नये, यासाठी पोलिसांनी सर्व अँगल्सवर सखोल चौकशी करावी, असे निर्देश देण्यात आले.
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा
मुंबईतील गोरेगाव परिसरातील ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना फडणवीस यांनी तरुणांच्या भविष्यासाठी अशा गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे आदेश दिले. ड्रग्जविरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका ठेवण्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
परतवाडा प्रकरणात समुपदेशनावर भर
परतवाडा येथील प्रकरणात पीडितांना समुपदेशनाद्वारे विश्वास देणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देताना समाजसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पोलिसांना करण्यात आल्या.एकूणच, राज्यातील विविध संवेदनशील प्रकरणांमध्ये जलद, निष्पक्ष आणि प्रभावी तपास करण्यावर गृहमंत्र्यांनी भर दिल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.