बारामती : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वक्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांनी बारामतीसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद सुनेत्रा पवार यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कामाचा जवळून आढावा घेतला असून, त्यांच्या अनुभवातून त्या दीर्घकालीन राजकारणात प्रभावी भूमिका बजावू शकतात. “राजकारणातील माझ्या 35 वर्षांच्या अनुभवावरून एखाद्या नेत्याची क्षमता ओळखू शकतो, आणि त्यानुसार सुनेत्रा पवार सक्षम नेतृत्व देऊ शकतात,” असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली असून, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी आधीपासूनच सक्रिय सहभाग घेतल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या घटनेमागील सत्य समोर येईपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.सभेत त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत, ही निवडणूक अजित पवार यांच्या स्मृतींना श्रद्धांजली असल्याचेही सांगितले.