मुंबई : देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना 2027 प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) हा 16 मे ते 15 जून 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याआधी स्वयं-गणना (Self-Enumeration) टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल अॅप “Census 2027-HLO” तसेच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभाग (GAD) च्या 23 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्णयानुसार राज्य यंत्रणेची सक्रिय भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील ‘त्रिमूर्ती प्रांगण’ परिसरात जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जनगणना संदर्भातील बॅनर्सचे प्रदर्शन आणि माहितीपर साहित्याद्वारे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाबाबत अतिरिक्त मुख्य सचिव व राज्य नोडल अधिकारी श्रीमती सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आहे. मंत्रालयासारख्या प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे यासंदर्भातील माहितीचा व्यापक प्रसार होण्यास मदत होणार आहे.असे महाराष्ट्र राज्य जनगणना संचालनालय कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.