मुंबई : ताण विरहित जीवनासाठी सकारात्मक वृत्ती, मनाचे नियंत्रण, योग्य विचार आणि व्यवहारातील संतुलन आवश्यक असल्याचे मत लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे सुहास गुढाते यांनी व्यक्त केले. यांनी सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित ‘टेक वारी- २.० अंतर्गत’ महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात तणाव व्यवस्थापन याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अंतर्मनातील आवाज ऐकण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत सुहास गुढाते म्हणाले, दैनंदिन जीवनात प्रतिकूल व्यक्ती, परिस्थिती, नातेसंबंध, वाहतूक, प्रदूषण आणि महागाई यासारख्या अनेक घटकांमुळे निर्माण होणारा ताण गुंतागुंतीचा ठरते. ताण हा केवळ दुःखाशी संबंधित नसून आनंदाच्या क्षणातही तो अनुभवण्यास येतो. ताणाचा मनाशी असलेला संबंध अधोरेखित करत ते म्हणाले, माणूस हा शरीर आणि मन या दोन घटकांचा बनलेला असून ताणमुक्तीची गरज मनाला असते.
आंतरव्यक्ती संबंधांमधील मतभेद आणि अपेक्षा यादेखील ताणाचे महत्त्वाचे कारण ठरतात. कुटुंब हा ताणमुक्तीचा आधार असून प्रत्येकाने स्वतःचा स्वभाव आणि क्षमता समजून घेतल्यास ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी ताण येऊ नये म्हणून आपल्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले
ताण-तणाव निर्माण होण्यामागे व्यक्तीचे विचार निवडी कारणीभूत असून त्यामध्ये सुधारणा केल्यास परिस्थिती बदलू शकते. तसेच मनातील बदलांशिवाय ताणमुक्ती अपूर्ण असल्याचे गुढाते यांनी सांगितले. शरीर-मनाच्या नात्याचा उहापोह करताना गुढाते मानवी शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असून भावनांच्या तीव्रतेमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. मात्र, नकारात्मक मानसिक प्रभावांमुळे पेशींचे सहकार्य कमी झाल्यास विविध आजार उद्भवतात. आजच्या काळातील अनेक आजार हे मनोशारीरिक स्वरूपाचे असून केवळ औषधोपचार पुरेसे नसून मनातील बदलही आवश्यक ठरतात औषधांसोबत मनःशांती जोडा असा संदेशही त्यांनी दिला.या व्याख्यानास मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.