मुंबई : राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगामी काळातील सर्व परदेश दौरे रद्द करावेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दिले आहेत. यापूर्वी मंजूर झालेले दौरे देखील स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि विदेशी चलनाच्या जपणुकीसाठी परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विविध विभागांतील अभ्यास दौरे, बैठका आणि अधिकृत कामांसाठी होणारे परदेश प्रवास आता थांबवण्यात येणार आहेत. यासोबतच मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या आहेत, याचा आढावा सामान्य प्रशासन विभागाकडून घेतला जाणार असून अनावश्यक वाहनांवर मर्यादा आणण्याची तयारी सुरू आहे.
विशेषतः जिल्हा दौऱ्यांदरम्यान काही मंत्र्यांच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर होत असल्याची चर्चा आहे. आता इंधन बचतीच्या दृष्टीने ताफे मर्यादित करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, काही मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यास सुरुवात केल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनीही आपला नियोजित युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम येथे कुटुंबासोबत जाण्याचे नियोजन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, देशहित आणि विदेशी चलन बचतीचा संदेश लक्षात घेऊन त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या ताफ्यात जवळपास ५० टक्के कपात करण्यात आली असून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींची नागरिकांना प्रमुख आवाहने
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
परदेश प्रवास टाळा
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा
खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवा
नैसर्गिक शेतीकडे वळा
सोन्याची अनावश्यक खरेदी टाळा