पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रीनितीन गडकरी यांनी त्यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यात ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
१३ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, १४ आणि १५ मे रोजी होणाऱ्या दौऱ्यात इंधन बचत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार इंधनाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गडकरी यांनी या दौऱ्यात बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्यासोबत अधिकारी, पत्रकार आणि सुरक्षा कर्मचारीही बसने प्रवास करणार आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास तसेच नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या संदर्भात पुणे शहर पोलीस आयुक्त, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलीस अधीक्षकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.