पुणे : हिंजवडी येथील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीच्या फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून कंपनीचा मालक हर्षल ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. कंपनीने अचानक कार्यालय बंद करून शेकडो कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे 700 आयटी अभियंत्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉप डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये घेतले होते. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्यापासूनचे पगारही थकीत ठेवण्यात आले. त्यानंतर कंपनीचे कामकाज अचानक बंद झाले आणि व्यवस्थापनातील प्रमुख अधिकारी संपर्काबाहेर गेले.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हर्षल ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख, एचआर प्रमुख सौम्या सिंग यांच्यासह इतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात आलेली डिपॉझिट रक्कम, थकीत वेतन आणि कंपनीच्या खात्यांमधील व्यवहार यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. आवश्यक असल्यास आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हर्षल ठाकरेच्या अटकेनंतर पीडित कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी थकीत पगार आणि जमा केलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे. या तपासातून फसवणुकीचा नेमका आकडा आणि संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचे स्वरूप समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.