सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
  • अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ
  • मेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातमीचा परिणाम आशियाई बाजारांमध्ये दिसून आला आहे. जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांमध्ये तेजी सुरु आहे.
  • महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढली; १८ जूननंतर मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम
 विश्लेषण

महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढली; १८ जूननंतर मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

डिजीटल पुणे    15-06-2026 12:13:49

पुणे : जून महिन्याचा अर्धा टप्पा संपला असला तरी महाराष्ट्रातील अनेक भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार १८ जून ते २ जुलै दरम्यान राज्यासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये चांगल्या पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीही १८ जूननंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या 'एल निनो'मुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, १९५० नंतरचा सर्वाधिक प्रभावी एल निनो यंदा अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे देशातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागानेही एल निनोच्या प्रभावाला दुजोरा दिला असून यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एल निनोच्या प्रभावासोबतच अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे मान्सून सध्या कोकण किनारपट्टीच्या काही भागांतच थांबलेला असून राज्याच्या उर्वरित भागात त्याच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मान्सूनच्या विलंबाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी बी-बियाणे आणि खतांची खरेदी पूर्ण करूनही अनेक शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीची योग्य वेळ हातातून निसटत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून, वर्षभराच्या उत्पन्नाची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

हवामान अभ्यासकांच्या मते, यंदा पावसाचे वितरण असमान राहू शकते. काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असताना, काही ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती