पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा वर्षानुवर्षांचा मुक्काम भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरात होत असतो. दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येथे येत असल्याने मंदिर परिसरातील जागा अपुरी पडत होती. यामुळे पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनात आणि भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत अडचणी निर्माण होत होत्या.
या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची परंपरा अधिक भव्य, सुयोग्य आणि सुरळीतपणे पुढे सुरू राहावी तसेच भाविकांना सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मंदिरालगतच्या मिळकतधारकांनी स्वखुशीने आणि तडजोडीने आपली जागा प्रशासनाच्या ताब्यात दिली.
या सेवाभावी सहकार्याबद्दल संबंधित मिळकतधारकांना त्यांच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे विठ्ठल मंदिर परिसराचा विस्तार होऊन भविष्यात पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
यावेळी मंजुषा नागपुरे यांनी संबंधित मिळकतधारकांच्या सहकार्याचे कौतुक करत, वारकरी परंपरेचे जतन आणि भाविकांच्या सुविधांसाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. माऊलींच्या सेवेसाठी दिलेले हे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, नगरसेवक विशाल धनवडे, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित मिळकतधारक उपस्थित होते.