पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीचे पाणी पिऊ नये किंवा वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
तुकाराम बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन केले होते, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. या पवित्र सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात.परंपरेनुसार, हे वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
GBS आजारामुळे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
GBS हा दुषित पाण्यामुळे पसरणारा गंभीर आजार असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व वापरण्यास मनाई केली आहे. वारकऱ्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात GBS ने थैमान घातल्याचे दिसून आले. पुण्यात सर्वाधिक याचे रुग्ण आढळले. तर, काही जणांचा यामुळे मृत्यू देखील झालाय. या आजारामागील प्रमुख कारण हे दूषित पाणी ठरले, त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.