जम्मू-कश्मीर: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने एक कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने सुमारे ४८ रिसॉर्ट्स आणि अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दूधपात्री, वेरीनागसह अनेक लोकप्रिय ठिकाणे आता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
सुरक्षा यंत्रणांची शिफारस
हे पाऊल केंद्र व राज्य सुरक्षा यंत्रणांच्या सूचनेनुसार उचलण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुप्तचर विभागांनी घाटीतील काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे घाटीतील ८७ पर्यटनस्थळांपैकी ४८ ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
टीआरएफचा संभाव्य धोका
गुप्त माहिती नुसार, टीआरएफ या दहशतवादी संघटनेला सुरक्षादलांच्या कारवाईचा सूड घेण्यासाठी मोठ्या हल्ल्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे गुलमर्ग, सोनमर्ग, डल लेक यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलिस पथके व अँटी-फिदायीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.
पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम
या निर्णयाचा सर्वात मोठा फटका काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला बसणार आहे. हॉटेल व्यवसाय, स्थानिक उत्पादने, फळ व्यापार यावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर स्थिर होत चाललेल्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची भीती आहे.
सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच या पर्यटनस्थळे पुन्हा उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.