पुणे : देशभरात आधीच हिंदू- मुस्लिम वातावरण तापलेले असताना पुण्याजवळील मुळशीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी दुपारी सुमारे तीन वाजता चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने अन्नपूर्णा देवीची मूर्ती मंदिरातून खाली उतरवून तिची विटंबना केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश जाधव नावाचे गृहस्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अन्नपूर्णा देवीची मुर्ती हलवलेली असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ही बाब तातडीने शिवाजी वाघवले यांना कळवली. त्यानंतर वाघवले, जाधव आणि गावातील इतर काही ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटिव्ही तपासात चाँद नावाचा युवक मूर्तीची विटंबना करताना आढळून आला.
हा युवक नेमका कोण आहे आणि तो कुठे राहतो याबाबत गावकऱ्यांनी माहिती काढली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित सर्वजण चाँदच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी त्याचे वडील नौशाद शेख यांच्याकडे या कृत्याबाबत विचारणा केली असता, शेख यांनी त्या तरुणांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी चाँद शेख व त्यांचे वडील नौशाद शेख यांना थेट पौड पोलिस ठाण्यात आणले. पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी जमावाला शांत केले. चाँद शेख आणि नौशाद शेख यांना उपचारासाठी प्रथम पौड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्या नंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेनंतर संताप, बंद आणि शांततेचा निर्धार
या घटनेमुळे संपूर्ण पौड गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज पौड गावात बंदची हाक देण्यात आली असून, मुळशी तालुक्यातही बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी चाँद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा निषेध केवळ पौडमध्येच नव्हे, तर पुणे शहरातही होत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना संयमाचे आणि शहाणपणाचे आवाहन केले. एका ग्रामस्थाने सांगितले की, “आंब्याच्या आडीतील दोन आंबे नासले म्हणून संपूर्ण आडी नासते असे नाही. त्यामुळे दोन्ही समाजांनी शांतता राखत या घटनेचा निषेध करावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी पौड पोलिस ठाण्याला निवेदन सादर करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.