अहमदाबाद : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. यात महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. विमानाच्या टेकऑफनंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला.
महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत.
अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडिया विमान दुर्घटना ही भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना ठरू शकते. टेकऑफनंतर विमान आवश्यक उंचीवर न गेल्याचे लक्षात येताच, वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’द्वारे तातडीचा संदेश दिला. पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदात संपला. या भीषण दुर्घटनेत 265 जणांचे प्राण गेले.विमानाचा अपघात नेमका का झाला?, याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेची चार संभाव्य कारणं व्यक्त केली जात आहे.
एअर इंडिया विमान दुर्घटनेची चार संभाव्य कारणं-
1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...
2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...
3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...
4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...