मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. यादरम्यान पोलीसांकडून नितीन देशमुख यांना अटक करण्यापूर्वीच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर बसले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
कारण गुरुवारी विधानभवनात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यादरम्यान पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांच्याशी हाणामारी केली. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे की, हाणामारी करणाऱ्यांना अटक करण्याऐवजी पोलीस त्यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेत आहेत.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
गुरुवारी महाराष्ट्र विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. बुधवारी आव्हाड आणि पडळकर यांच्यात जोरदार राडा झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेचा अहवाल मागवला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावरील लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर काही काळ परिस्थिती बिघडली परंतु तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोन्ही गटांना वेगळे केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गटातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
पडळकर म्हणाले – मला या घटनेबद्दल माहिती नाही
यानंतर पडळकर पत्रकारांना म्हणाले, “मला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही. तुम्ही त्यांना (आव्हाड) विचारू शकता, ते सभागृहात बसले आहेत. मी या (घटनेत) सहभागी असलेल्या कोणालाही ओळखत नाही.” यानंतर, भाजप आमदाराने वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला अनुसरून नाही. “विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांनी या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
फडणवीस म्हणाले की, विधानभवनात इतक्या मोठ्या संख्येने लोक येणे आणि गोंधळ घालणे ही गंभीर बाब आहे. माजी मंत्री आव्हाड यांनी विधानभवन परिसरातील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी दावा केला की, “जर आमदार विधानभवनातही सुरक्षित नसतील, तर लोकप्रतिनिधी असण्याचा काय अर्थ आहे? आमचा गुन्हा काय आहे? मी फक्त ताजी हवा घेण्यासाठी बाहेर आलो होतो. मला वाटते की ते माझ्यावर हल्ला करण्यासाठी आले आहेत.” बुधवारी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आव्हाड आणि पडळकर यांच्यात वाद झाला. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसून येते. मुंब्रा-कळवाचे आमदार आव्हाड यांनी दावा केला की पडळकर यांनी गाडीतून उतरताना जाणूनबुजून त्यांच्या गाडीचा दरवाजा खूप जोरात उघडला, जेणेकरून त्यांना दुखापत होईल. पडळकर यांनी या आरोपावर भाष्य केले नाही.