नवी दिल्ली : आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात PM मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करत भारताची लष्करी ताकद जगासमोर मांडली. ते म्हणाले, 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांनी आयएसएसवर तिरंगा फडकवणाऱ्या अंतराळवीर शुभांशूचे अभिनंदन केले. अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून 18 बैठका होतील. 8 नवीन आणि 7 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार आहे. नवीन आयकर विधेयकावर समितीने 285 शिफारसी दिल्या असून, हे विधेयक 1961 च्या कायद्याची जागा घेईल.
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’सह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमधील मतदार फेरपडताळणी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर नियमानुसार चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. तर महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावं,अशी अपेक्षा ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये 51 राजकीय पक्षाचे 54 सदस्य उपस्थित होते.
विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहांत चर्चेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.