२०१९ पासून आपण कोल्हापूर/सांगली या पट्ट्यामध्ये पुराचा विळखा पहात आलो आहोत. निसर्गाच्या कृपेने २०२० साल पावसाच्या दृष्टीने कोल्हापूरला चांगले गेले. मुळातच कोल्हापूर/सांगलीचा हा भाग पहिला तर मोठ मोठ्या नद्यांचा व तलावांचा प्रदेश. कोल्हापुर मधील रंकाळा, कळंबा हे तलाव तर सर्वांना परिचितच आहेत, पण कधी काळी कोल्हापूर शहरामध्ये फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर, कळंबा तलाव अशी तलावे होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. त्यातील आता रंकाळा, कळंबा आणि कोटीतीर्थ हे तीन तलावच आता शिल्लक आहेत.
तलावांबरोबरच जिल्ह्यामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रमाणही खूप आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते. पंचगंगाला काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती, तिळवणी ओढा, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार आदी ओढे मिळतात. पंचगंगा नदी पूढे जाऊन नृसिंहवाडी जवळ कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने कोल्हापूर/सांगली पट्ट्याने चांगली प्रगती केली आहे. शाहू महाराजांनी पूर्ण जिल्हा सुपीक करण्यासाठी राधानगरी सारखे आशिया मधले पहिले स्वयंचालित दरवाजे असणारे धरण बांधले. ११२ वर्षे होऊन गेली तरी या धरणाला अजिबात गळती नाही आहे. आजही हे धरण १००% भरले तरी पाणी थांबवून ठेवू शकते. गळती असती तर धरण १००% भरायच्या आधीच पाणी सोडून द्यावे लागते नाहीतर धरण फुटण्याचा धोका असतो. या धरणाने बराच भाग जलसिंचनाखाली आणला आहे.
