मुंबई : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा आणि जनजागृतीसाठी २०१८ पासून ‘पोषण माह’ अभियान राबविण्यात येते. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ८ वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभांचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’साठी यंदा केंद्र शासनाने “लठ्ठपणा कमी करणे, बालपणाची काळजी व शिक्षण (ECCE) / पोषणही शिक्षणही, अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF), पुरुष सहभाग, व्होकल फॉर लोकल व स्वावलंबन, एकत्रित कृती व डिजिटायझेशन” या सहा प्रमुख थीम निश्चित केल्या आहेत. बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नवनियुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास व इतर विभागांच्या समन्वयाने व अभिसरणाच्या माध्यमातून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.
महाराष्ट्र राज्याने पोषण अभियानांतर्गत मागील सात वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सन २०२४ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षी देखील विविध जनजागृती उपक्रम, वेबिनार, दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच जन आंदोलन डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करून पोषणयुक्त महाराष्ट्र आणि सुपोषित भारत घडविण्याचा संकल्प आहे.