पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी दूरध्वनीवर संवाद साधत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आरोपीला जगण्याचा अधिकार नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असे शिंदे यांनी सांगितले.यावर पीडितेच्या वडिलांनीही तीव्र भावना व्यक्त करत, “जसे उत्तर प्रदेशमध्ये कठोर निर्णय घेतले जातात, तसेच निर्णय महाराष्ट्रातही व्हावेत. आरोपीला वर्षानुवर्षे जिवंत ठेवू नका,” अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. “कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला मृत्यूदंड मिळेल, यासाठी वेगाने चार्जशीट दाखल करून प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेचा तपशील
सुट्टीसाठी आजीकडे आलेली चिमुकली घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने मृतदेह लपवण्याचाही प्रयत्न केला. ग्रामस्थांनी संतप्त होऊन आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ग्रामस्थांचा संताप, आंदोलन
या घटनेनंतर नसरापूर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. नागरिकांनी रास्ता रोको आणि मोर्चे काढत निषेध नोंदवला. काही काळ पुणे-बंगळुरू महामार्गही रोखण्यात आला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पीडित कुटुंबाची भूमिका
पीडित मुलीच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका घेत, “मुलीला न्याय मिळेपर्यंत नेत्यांनी भेट देऊ नये,” असे आवाहन केले आहे. काही जण फोटो काढून राजकारण करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.