मुंबई : बारामतीच्या राजकारणात 2029 च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ बारामतीतून उमेदवारीच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदासाठीही सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येऊ शकते, असे संकेत जय पवार यांनी दिले.
अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत बारामतीतील आपली ताकद सिद्ध केली. त्यानंतर त्यांच्या राजकीय नेतृत्वाबाबत चर्चा अधिकच वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर 2029 मध्ये बारामतीतून कोण निवडणूक लढवणार, यावर विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जय पवार यांनी खासदारकीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “माझं नाव चर्चेत असलं तरी मी सर्वांसाठी इथेच काम करणार आहे,” असं सांगत त्यांनी लोकसभेत जाण्याची शक्यता फेटाळली.
दरम्यान, बारामतीतील कार्यकर्ते आणि नागरिकांची भावना व्यक्त करताना जय पवार म्हणाले की, “दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची अनेकांची इच्छा होती. आता वहिनीही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये त्या बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव पुढे यावं, अशी आमची अपेक्षा आहे.”
जय पवार यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे. सध्या राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर शिवसेनेकडूनही एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असते. अशातच राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत असल्याने 2029 च्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.