मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या सुमारे 14 हजार पुरुषांकडून मिळालेली संपूर्ण रक्कम परत वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विविध विभागांच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये चारचाकी वाहनधारक, उत्पन्न मर्यादा ओलांडणारे तसेच इतर निकष पूर्ण न करणारे लाभार्थी आढळून आले. याशिवाय, महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ 14 हजार पुरुषांनी घेतल्याचेही निदर्शनास आले आहे.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पात्र महिलांकडून आधी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नाही. मात्र, फसवणूक करून लाभ घेतलेल्या पुरुषांविरुद्ध कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न करणे किंवा पात्रतेच्या अटींची पूर्तता न झाल्यामुळे सुमारे 80 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. राज्यातील सुमारे 1 कोटी 70 लाख पात्र महिलांना मात्र योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, ज्या महिलांना आपण पात्र असूनही लाभ मिळत नसल्याची भावना आहे, त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा ई-केवायसी विंडो सुरू करण्यास तयार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. यामुळे पात्र महिलांना पुन्हा एकदा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची संधी मिळणार आहे.