मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित खाण प्रकल्पावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांना हरताळ फासून टायगर कॉरिडॉर परिसरातील जंगल खाण प्रकल्पांसाठी खुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गडचिरोलीतील हेद्री आणि आसपासच्या भागात प्रस्तावित खाण प्रकल्प हा संरक्षित वाघ मार्गिकेच्या (टायगर कॉरिडॉर) परिसरात येत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. ताडोबा आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या वनक्षेत्रात खाणकामास परवानगी देणे धोकादायक ठरेल, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) श्रीनिवास रेड्डी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एप्रिल आणि मे महिन्यातील अधिकृत पत्रांमध्ये विरोधाभासी भूमिका घेण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सांगितले.
दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अभिजित दीपके यांच्या भूमिकेलाही ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला. सरकार घाबरलेले नसेल तर आंदोलनाला परवानगी द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.