मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवरटीका करताना ते भटकती आत्मा असल्याचे म्हंटल होते. मोदींच्या या टीकेवर पलटवार करत मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले होते. मात्र पवारांच्या याच विधानावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार कधीच अस्वस्थ नसतात.. ते जर कधी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते असं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलं.
सिंधुदुर्ग येथील जाहीर सभेत बोलताना नारायण राणे यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाल की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. संरक्षण मंत्री दोन वर्षे राहिले. त्यानंतरही काहीच करु शकले नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक पद भोगली तरी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आता अस्वस्थपणा का जाणवतो, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
मोदी पवारांबद्दल काय म्हणाले होते?
पुणे येथील जाहीर सभेत बोलताना मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती. ‘महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं, तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे’, अशी टीका मोदींनी शरद पवारांवर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी सुद्धा म्हंटल कि, होय माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही.