इंदापूर : राज्यात जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे. तसा राजकीय वातावरण देखील चांगलचं तापू लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पवार विरूद्ध पवार लढतीत आता प्रचाराला वेग आला आहे. दोन्ही बाजूंनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अशातच प्रचाराच्या प्रत्येक ठिकाणी पारावर, चौका चौकात 'अजित पवारांनी साहेबांना या वयात सोडायला नको होतं' ही एकच चर्चा आहे. यावर आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
काही जण म्हणतात, या वयात दादांनी साहेबाला सोडायला नको होतं, अशी पारावर अशी चर्चा करतात. मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब (शरद पवार) म्हणतील ती पूर्व दिशा. लहान असताना आजी आजोबांनी सांगितलं होतं, आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गीय वसंत दादा पवार हे पोटनिवडणुकीला उभे होते. त्यावेळी शरद पवार हे महाविद्यालयात होते. त्यावेळी शरद पवारांनी आमच्या थोरल्या काकांचा विरोध केला. अख्खं पवार कुटुंब शेकापच्या बाजूने होतं. त्यावेळी शरद पवारांनी विरोधी काम केलं. ही सुरुवात झाली. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार उभे राहिले. असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला संधी मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही नंतर संधी मिळाली. शरद पवारांनी मला संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी निवडणुकीची संधी दिली होती. अशी आठवण देखील त्यांनी काढली. सुनेत्रा पवार यांच्यासाठी इंदापुरात जाहीर सभा पार पडली. त्यावेळी भाजपचे हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते.
दरम्यान, ही निवडणूक गावकी - भावकीची निवडणूक नाही. देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत, की राहुल गांधी हा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली आहे. १९८४ मध्ये भवानीमाता पॅनल केलं होतं. तिथे मला संचालक केलंत. तिथून माझी राजकीय सुरवात झाली. राजकारणात येईन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. मला उगाच कुणाला हेलपाटे घालून द्यायला आवडत नाही. ” असं म्हणत अजित पवारांनी पवारांना टोला लगावला.