पुणे: शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाढवळ्या हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. आज पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागात रक्तरंजित थरार उडाला आहे. बाजीराव रोड परिसरात 17 वर्षीय मयंक खराडे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत झालेला हा दुसरा खून आहे. दोनच दिवसांपूर्वी गणेश काळे हत्याकांडाने शहर हादरलं होतं, आणि आता पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने पुणे दणाणलं आहे.
घटनेची प्राथमिक माहिती अशी की, आज दुपारी सुमारे 3.15 वाजता मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे हे दोघं दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळ समोर तीन तरुणांनी त्यांना अडवलं. या तिघांनी तोंडावर मास्क लावलेले होते. त्यांनी मयंकच्या डोक्यात आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आज पुण्यात भर दुपारी बाजीराव रस्त्यावरती एका युवकाचा खून झाला. मोठ्या प्रमाणावर रहदारी असताना हा हल्ला झाला व त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.काही दिवसापूर्वी कोंढवा भागामध्ये अशाच पद्धतीने खून झाला. या पुण्यामध्ये हे सर्व काय चालू आहे असा सवाल आता सर्वच जण विचारीत आहेत. पुण्याचे आपणच शिल्पकार असल्याच्या घोषणा करणारे आणि स्वतःला चाणक्य समजणारे नेते कुठे आहेत? शांत शहर, सुसंस्कृत शहर असे प्रसिद्ध असलेले,शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता गँग आणि वेगवेगळ्या टोळ्या त्याचबरोबर भुरटे चोर आणि गुन्हेगार यांचे माहेरघर बनत चालले आहे का?
याविषयी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ' या दादा लोकांच्या दहशती पुढे पुण्यातील पोलीस पूर्ण हतबल झाले आहेत का? स्वतःला दादा म्हणवून घेणारे आमचे आजी, माजी पालकमंत्री कुठे आहेत? दादांनो सामान्य पुणेकरांना वाचवा, तुमची दादागिरी जनतेच्या संरक्षणासाठी वापरा. पुणेकर उद्विग्न झालेला आहे. या गुन्हेगारीचा शहर बनण्याला महायुती सरकार चे ट्रिपल इंजिन जबाबदार आहे.' असे आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केले आहेत.