सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 व्यक्ती विशेष

उद्धव ठाकरे म्हणाले “सरकार दगाबाज”, श्रीकांत शिंदे यांचा पलटवार ; “उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली”

डिजिटल पुणे    05-11-2025 16:26:12

मुंबई  : मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा एकदा भेट देण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार असून, सरकारकडून दिल्या गेलेल्या 31 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला का, याचा आढावा घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि “हे सरकार दगाबाज आहे” अशी टीका केली. मात्र, त्यांच्या या विधानावर शिवसेना (शिंदे गट)चे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार करत म्हटलं “हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना काय दिलं? ओल्या दुष्काळात 36 हजार कोटींचं पॅकेज आमच्या सरकारने दिलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज शेतकऱ्यांच्या दु:खावर बोलत आहेत.”

श्रीकांत शिंदे यांनी पुढे म्हटलं “उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. तीच रटाळ टीका लोकांना रोज ऐकायची नाही. शेतकऱ्यांना माहिती आहे कोण त्यांच्या पाठीशी उभं आहे.”दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनीही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं “उद्धव साहेबांचा हा दौरा निवडणुकीसाठी आहे. ते जिथं जातात तिथं निवडणुका लागतात. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली आहे, थोडा उशीर झाला पण मदत पोहोचली.”राज्यातील महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली आहे. तरीही काहींना अद्याप लाभ मिळालेला नाही, यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितलं की,“महायुतीची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. आमच्या शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. वैजापूर आणि दहिसरमध्ये पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्येही आम्हाला यश मिळेल.”त्यांनी स्पष्ट केलं की, बहुतांश ठिकाणी महायुती एकत्रितपणे लढणार असून, स्थानिक पातळीवरील काही ठिकाणी वेगळी परिस्थिती असेल तर त्यावर निर्णय घेतला जाईल


 Give Feedback



 जाहिराती