नवी दिल्ली : नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या सर्वसमावेशक व सतत प्रगती करणाऱ्या विकास मॉडेलचे कौतुक केले आणि ‘विकसित भारत @2047’ च्या राष्ट्रीय संकल्पात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.केंद्रीय उद्योग मंत्री गोयल यांनी महाराष्ट्र दालनातील प्रत्येक विभागास भेट दिली. आणि कारागिर, स्वयं-सहाय्यता गटातील महिला उद्योजिका तसेच नवउद्योजकांशी थेट संवाद साधला. पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग, हाताने रंगवलेल्या चामड्याच्या वस्तू, ग्रामीण महिलांनी तयार केलेले ताजे पारंपरिक पदार्थ, ऑर्गॅनिक उत्पादने आणि ‘मराठी भाषा दालन’ यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मैत्री कक्ष उद्योग विभागातील उज्ज्वल सावंत व प्रियदर्शनी सोनार ह्यांनी मैत्री कक्षा ची माहिती दिली.
या पाहणीनंतर केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले, महाराष्ट्राचे दालन हे प्राचीन परंपरा आणि आधुनिक उद्योगक्षमतेचा उत्तम संगम आहे. ग्रामीण भागातील महिलांची उद्योजकता, पारंपरिक हस्तकला आणि स्टार्टअप्समधील नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ येथे दिसतो. हे दालन केवळ महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रतिबिंब नाही, तर इतर राज्यांसाठीही एक आदर्श आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे स्थानिक उत्पादने आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ठोस प्रयत्नांमुळे आणि उद्योग-व्यापार क्षेत्रातील सक्रिय योगदानामुळे ‘विकसित भारत @2047’ चे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने कंपनी सचिव अक्षय पाठक यांनी मंत्री गोयल यांचे स्वागत केले, यावेळी महामंडळातील बांगळकर, कोटूरकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दालनाची संकल्पना, उद्दिष्टे, सहभागी जिल्हे व विभाग आणि रचना याबाबत सविस्तर माहिती दिली.