नागपूर : “गत चाळीस वर्षांपासून नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण स्वमालकीच्या घरांपासून वंचित असलेल्या अनेकांना त्यांच्या नावाचे पट्टे बहाल करत आहोत. यासाठी पहिल्यांदा मी आमदार झालो, तेव्हा पट्टेवाटपाचा शासन निर्णय काढण्यात आपल्याला यश मिळाले. मुख्यमंत्री झाल्यावर याबाबत आपण धोरणात्मक निर्णय घेतला. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभाग, महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांनी परस्पर समन्वयातून केलेल्या जलद कार्यवाहीमुळे आज अनेकांनी आयुष्यभर जपलेल्या इच्छांची पूर्ती होऊ शकली”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हा पॅटर्न आता राज्यभर लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतापनगरातील शांतिनिकेतन कॉलनी पटांगणावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सर्वश्री नाना श्यामकुळे, सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर नंदा जिचकार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या काळात फाळणीमुळे आपले आहे ते सर्वस्व सोडून आलेल्या सिंधी बांधवांना अनेक महानगरांत रेफ्यूजी कॉलन्यांमध्ये रहावे लागले. मागील काही वर्षांत अनेक आव्हाने स्वीकारून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. इतकी वर्षे निर्वासीत म्हणून नावावर लागलेले बिरूद आता निघून सन्मानाने ते ज्या जागेवर रहात आहेत, त्या जागेची मालकी त्यांच्या नावावर झाली आहे. त्यांना फ्रि होल्ड जागेची मान्यता मिळाली आहे. आम्ही केवळ जागेचा पट्टा त्यांना देत नसून त्यांच्या हक्काचा सन्मान त्यांना प्रदान करताना आम्हाला विशेष समाधान असल्याची कृतज्ञता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात व्यक्त केली.
नागपूरमधील अनेक भागात झुडपी जंगलांचा प्रश्नही खूप वर्षांपासून प्रलंबित होता. महानगराच्या हद्दीत असलेले काही भाग झुडपी जंगलाच्या नावाखाली होते. यामुळे येथील रहिवाशांनाही राहात असलेली जागा स्वतःच्या नावावर होण्यात अडचणी होत्या. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून जवळजवळ आठ वर्षांचा कालावधी आपण न्यायालयीन लढ्यासाठी दिला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत न्याय दिल्यामुळे आता हा प्रश्नही मार्गी लागल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आज ज्यांची कच्ची घरे आहेत, त्यांनाही पक्की घरे मिळावीत यासाठी आपण सर्वांसाठी घरे योजना आणली आहे. याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेतून पुढच्या टप्प्यात प्रत्येकाला पक्के घर देऊ, असे त्यांनी सांगितले.
काही मंडळी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, आता पट्टेधारक हे जागेचे कायदेशीर मालक झाले आहेत. आर्थिक अडीअडचणीप्रसंगी आता घर तुमच्या नावावर असल्याने बँकाही मदत करतील. कायदेशीर हक्कच तुमच्याकडे आल्याने घराबाबत अथवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरणाबाबत प्रत्येकाला निर्णय घेता येईल, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले. झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे व सहकाऱ्यांचा त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून गौरवपूर्ण उल्लेख केला.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गी लावला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मालकी हक्काचे पट्टे हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलतेने हाताळून तो मार्गी लावला. यामुळे हजारो लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे मिळत आहेत, हे पाहून समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले.नागपूर हे देशातील मोजक्या स्मार्ट शहरांपैकी एक शहर म्हणून गणले जात आहे. स्मार्ट शहरामध्ये ज्या सुविधा आवश्यक असतात, त्यात प्रामुख्याने क्रीडांगणे, सुविधायुक्त बाजारपेठा, उद्याने, भाजी मार्केट, परिवहन सुविधा याचबरोबर सक्षम पाणीपुरवठ्यासह सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन यावर भर असतो. या सर्व बाबी आपण नागपूर शहरामध्ये अंतर्भूत केल्या असून त्यातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. शहरातील बगिच्यांना आकर्षक करण्यासाठी खासगी कंपन्यांचा सहभाग घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
संत झुलेलाल यांचा नारा आणि शासनाप्रती कृतज्ञता
सिंधी कॉलनी परिसरात पट्टे वाटपाचा हा कार्यक्रम असल्याने स्वाभाविकच सिंधी बांधव या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सिंधी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विकी कुकरेजा व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. फाळणीपासून रेफ्युजी म्हणून असलेली आमची ओळख देवाभाऊने आता मिटवली असून आम्हाला आमच्या हक्काचा सन्मान या जागेच्या मालकीतून व पट्टेवाटप मोहिमेतून मिळाल्याची भावना नारायण आहुजा, विनोद चावला यांनी व्यक्त केल्या.
शहर विकास मंचातर्फे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मालकीपट्टे योजना लागू करून झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा दिल्याबद्दल शहर विकास मंच नागपूरच्या वतीने संयोजक अनिल वासनिक, रामदास उईके, राजकुमार वंजारी, कवडुलाल नागपुरे व पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीसह अभिनंदन पत्र मुख्यमंत्र्यांना सन्मानपूर्वक दिले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काच्या पट्ट्यांचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध करणाऱ्या ‘एनएमसी स्मार्ट मित्र’ (एआय मित्र) या ‘डिजिटल हेल्पडेस्क’ सुविधेचे लोकार्पणही यावेळी पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी आशा पठाण यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात एक हजार पट्टे वाटपाची व्यवस्था करण्यात आली.