मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पत्रकार परिषद बोलावली आहे. काल राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आयोगाकडून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याने महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आजच होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्रकार परिषदेनंतर राज्यात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू होणार का, याबाबतही स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.राज्यात सध्या एकूण २९ महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून आजच्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोणत्या २९ महानगरपालिकांची निवडणूक होणार?
1. अहिल्यानगर
2. अकोला
3. अमरावती
4. भिवंडी-निजामपूर
5. बृहन्मुंबई
6. चंद्रपूर
7. छत्रपती संभाजीनगर
8. धुळे
9. इचलकरंजी
10. जळगाव
11. जालना
12. कल्याण-डोंबिवली
13. कोल्हापूर
14. लातूर
15. मालेगाव
16. मीरा-भाईंदर
17. नागपूर
18. नांदेड-वाघाळा
19. नाशिक
20. नवी मुंबई
21. पनवेल
22. परभणी
23. पिंपरी-चिंचवड
24. पुणे
25. सांगली-मिरज-कुपवाड
26. सोलापूर
27. ठाणे
28. उल्हासनगर
29. वसई-विरार
कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपेक्षित?
धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.आजच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणुकांचा कार्यक्रम, टप्पे आणि आचारसंहितेबाबतची अंतिम घोषणा स्पष्ट होणार असून राज्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.