मुंबई : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यू तोतलाडोह गावाचे विस्थापन झाल्याचे सांगून राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, वाडंबा येथे विस्थापित झालेल्या या गावाला कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. आर्थिक मोबदला घेऊन त्यांना फक्त जमिनी दिल्या आहेत. त्यांना नागरी सुविधा देणे गरजेचे आहे. कायद्यानुसार त्यांना सुविधा देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.
दरम्यान, यावेळी सांगली जिल्ह्यातील कणेगाव या पूर बाधित गावच्या पुनर्वसनविषयही बैठक घेण्यात आली. त्यावेळी कालबद्ध कार्यक्रम आखून हा प्रश्न मार्गी लावावा. गावठाणातील जुन्या जागेचा रहिवासी वापर करता येणार नाही या अटींवर जागेची मालकी मूळ मालकाकडे ठेवण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव द्यावा. ज्यांनी पैसे भरले आहेत व स्थलांतरासाठी तयार आहेत त्यांना जागा वाटपाचे काम एक महिन्यात पूर्ण करावे अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.