सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 जिल्हा

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त ;मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

डिजिटल पुणे    29-12-2025 12:16:48

गडचिरोली  : गडचिरोली जिल्ह्यातील चुरचुरा हे गाव आता १०० टक्के गॅस सिलेंडरचे गाव झाले असून, ते पूर्णपणे धूरमुक्त झाले असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. चुरचुरा गावाचा हा आदर्श आता संपूर्ण राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

जंगलावरील अवलंबित्व संपवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार

चुरचुरा येथे आयोजित गॅस सिलेंडर वितरण कार्यक्रमात राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते. “एकही गाव आणि एकही घर असे राहू नये जिथे चूल पेटवण्यासाठी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागेल, असा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेल्यावर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात चुरचुरा ग्रामपंचायत सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा

यापूर्वी चुरचुरा गावातील ९२ कुटुंबांकडे गॅस जोडणी होती, मात्र ७२ कुटुंबे या सुविधेपासून वंचित होती. आता या सर्व ७२ कुटुंबांना दोन सिलेंडरसह गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यमंत्री जयस्वाल यांनी गावाला ‘उत्पादक’ बनविण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले, जेणेकरून आर्थिक उलाढाल वाढून संपन्नता येईल. ग्रामीण जनतेचा वकील म्हणून आपण विधानसभेत प्रश्न मांडत असल्याचे सांगत त्यांनी विकसित गडचिरोलीसाठी सर्वांच्या सहभागाची गरज व्यक्त केली.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची ग्वाही

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी सांगितले की, गावाला धूरमुक्त करण्यासाठी वनव्यवस्थापन निधीतून ११ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यमंत्र्यांनी मागील भेटीत दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले असून, आगामी काळात शासनाच्या इतर निधीतून गावात आर.ओ. शुद्ध पाणी, स्ट्रीट लाईट आणि इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येतील व यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पीडित कुटुंबांची भेट आणि तत्परता

कार्यक्रमानंतर राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी आरमोरी तालुक्यातील इंजेवाडी आणि देऊळगाव येथे भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुदाताई मेश्राम आणि मुक्ताबाई नेवारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.परतीच्या प्रवासात असताना देऊळगाव येथील श्री. धनपाल यांनी सहपालकमंत्र्यांच्या ताफ्याला हात दाखविला असता त्यांनी अत्यंत तत्परतेने दखल घेत आपला ताफा थांबवून त्यांच्या कुटुंबातील महिलेवर झालेल्या वाघाच्या जीवघेण्या हल्ल्याची आणि प्रलंबित मदतीची तक्रार एकूण घेतली व वनविभागाला त्या कुटुंबाला नियमानुसार तातडीने शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्याच्या सूचना घटनास्थळावरूनच दिल्या.सहपालकमंत्री यांच्या दौऱ्यात उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सरपंच श्री. खोब्रागडे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज म्हशाखेत्री, सुरजसिंग चंदेल व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती