नाशिक : आपण रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छता करतो. स्वच्छता कर्मचारी अस्वच्छता दूर करतात. अस्वच्छता दूर करणे हेच चांगल्या माणसाचे काम असल्याने प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.पिंपरखेड, ता. दिंडोरी येथे मारुती मंदिर परिसरात आज सकाळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, सरपंच सोनाली मोरे आदी उपस्थित होते.राज्यपाल श्री. देवव्रत यांनी मोहिमेत सहभाग घेतांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. प्रत्येकाने स्वच्छता ठेवून गाव सुंदर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.राज्यपाल श्री. देवव्रत यांनी गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.