मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे हे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, अशी ठाम भविष्यवाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी राज ठाकरे तसेच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, पण या युतीला आता काहीच अर्थ उरलेला नाही. जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी असती. त्या काळातच त्यांना जनतेचा कौल मिळाला असता. मात्र आता त्यांच्याकडे मतंच उरलेली नाहीत.”
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीचा राज ठाकरेंना कोणताही फायदा होणार नाही. उलट राज ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा होईल, पण उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना फायदा होणार नाही.”याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करताना फडणवीस म्हणाले, “जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही. काहींना विचारांचा वारसा मिळालेलाच नाही.”
देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? — उद्धव ठाकरेंचा सवाल
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल. भाजप म्हणते मुंबईचा महापौर हिंदू असेल. म्हणजे भाजपला मराठी माणूस हिंदू वाटत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई हिंदू होता की नव्हता?” असा सवाल उपस्थित करत भाजपच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र टीका केली.