पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निकालांबाबत मोठा दावा केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिकेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुण्यात भाजपला 115 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. आमच्याशिवाय इथे दुसरा कोणताही पर्याय नाही. ज्यांना पैजा लावायच्या असतील त्यांनी खुशाल लावाव्यात,” असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले. प्रभाग क्रमांक 24 मध्ये गणेश बिडकर आणि भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला.मुंबई महापालिकेबाबत बोलताना पाटील म्हणाले, “मुंबईत भाजपला 90 जागा आणि शिवसेनेला 40 जागा मिळतील. मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे.”
राजकीय आरोपांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “2014 नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा परिणाम लोकांना स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे सध्या सुरू असलेले आरोप केवळ बुडबुडे आहेत. मोदींचा चेहरा असो वा कमळ चिन्ह, लोकांचा विश्वास कायम आहे.”
दरम्यान, अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची पार्टी तुटलेली नाही. आम्ही लोकशाही मानणारी पार्टी आहोत. मात्र काही नेत्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आम्ही काही काळ बॅकफूटवर गेलो होतो.”चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यांमुळे महापालिका निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.