मुंबई : राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये यंदा मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचं चित्र आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी दिवसभर उत्साहात मतदान पार पडलं. मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये सकाळपासून मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. 100 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या झेन-झी मतदारांपर्यंत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मात्र, मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत दुपारी 3.30 वाजेपर्यंत केवळ 41.08 टक्के मतदान झालं. विशेष म्हणजे, कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत फक्त 15.73 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी स्पष्ट होणार आहे.
सोलापूर महापालिकेतही मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येत असून, अंतिम मतदान 52 ते 55 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत सोलापुरात 40.39 टक्के मतदान झालं होतं.
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक 50.85 टक्के मतदान झालं असून, कोल्हापूरने राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे.
राज्यातील 29 महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी (दुपारी 3.30 पर्यंत)
बृहन्मुंबई महानगरपालिका : 41.08%
ठाणे : 43.96%
कल्याण-डोंबिवली : 38.69%
नवी मुंबई : 45.51%
उल्हासनगर : 34.88%
भिवंडी-निझामपूर : 38.21%
मिरा-भाईंदर : 38.34%
वसई-विरार : 45.75%
पनवेल : 44.04%
नाशिक : 39.64%
मालेगाव : 46.18%
धुळे : 36.49%
जळगाव : 34.27%
अहिल्यानगर : 48.49%
पुणे : 36.95%
पिंपरी-चिंचवड : 40.50%
सोलापूर : 40.39%
कोल्हापूर : 50.85%
सांगली-मिरज-कुपवाड : 41.79%
छत्रपती संभाजीनगर : 43.67%
नांदेड-वाघाळा : 42.47%
लातूर : 43.58%
परभणी : 49.16%
अमरावती : 40.62%
अकोला : 43.35%
नागपूर : 41.23%
चंद्रपूर : 38.12%
इचलकरंजी : 46.23%
जालना : 45.94%
अंतिम मतदानाची टक्केवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचा संपूर्ण चित्रपट समोर येणार आहे.