मुंबई : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमीने मी अक्षरशः हादरून गेलो आहे. मन सुन्न झाले आहे. या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणतात, प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अजितदादांचा प्रशासनातील अनुभव अतिशय समृद्ध होता. अनेकदा मी स्वतः त्यांच्याकडून सल्ला घेत असे. विविध विषयांवर त्यांच्याशी हक्काने चर्चा करीत असे. काम करत असताना अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. त्यांच्या सहवासातून मी स्वतः अनेक गोष्टी शिकलो.
अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; ते महाराष्ट्रावर कोसळलेले एक मोठे संकट आहे. देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला आहे आणि मी माझा एक जिवलग ज्येष्ठ मित्र! अजितदादा आता आपल्यात नाहीत ही जाणीव अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. अजितदादांसह या अपघातात मृत्यु पावलेल्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकीयांच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.