बारामती – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथील भेटीला येत असताना, त्यांचे विमान लँड होत असताना प्रचंड स्फोट झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. आज त्यांच्या अंत्यविधी बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे करण्यात आले. सकाळी त्यांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणले गेले, त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान या मार्गावर प्रचंड जनसागर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता.

विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थिव चौथऱ्यावर ठेवला असता, शोकाकुल वातावरण पसरले. पवार कुटुंबातील सर्व सदस्य, कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, नातेवाईक आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप दिला.
कार्यकर्त्यांच्या अश्रूंनी वातावरण भावनिक केले, महिला कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सर्वत्र "अजितदादा अमर राहो!" अशा घोषणांनी गजर केला. आजच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती – अनावर दुःख आणि अपुरं जाणवणारी हानी.अजित पवार यांच्या आठवणीत महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि नागरिक कायम त्यांना श्रद्धांजली अर्पण करत राहतील.
