बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत प्रचंड जनसमुदाय लोटला होता. शोकाकुल वातावरणात हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. मात्र, या भावनिक प्रसंगाचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी गर्दीत हात साफ केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अंत्यसंस्कार सुरू असताना विविध ठिकाणी नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात तब्बल २० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे यांच्यासह इतर काही नागरिकांच्या सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरीस गेली आहे.
पोलिसांची जलद कारवाई – ७ जणांना अटक
गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले आरोपी असे:
राजकुमार बाबुराव आठवले (तलवाडा, गेवराई, बीड)
मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ)
एजाज भगु मीरावले (गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ)
मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ)
बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (मूळ रा. पाथर्डी, सध्या पळसदेव, इंदापूर)
तुषार कैलास मासाळ (कोरडगाव, शेवगाव, अहिल्यानगर)
नितीन अंकुश गायकवाड (शिक्षक कॉलनी, बीड)
पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे. आरोपींची सखोल चौकशी केली जात असून या टोळीचा यापूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जात आहे.