मुंबई : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ‘संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी, महाराष्ट्र बीपीसीएलचे प्रमुख रिटेल (पश्चिम)चे थॉमस जेम्स, एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएलचे राज्य प्रमुख (रिटेल) चे मिहिर जोशी, एचपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक बरुण कुमार, आयओसीएलचे महाव्यवस्थापक देवांशू मिश्रा, गेल इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक (विपणन) जितेंद्र गुप्ता, राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ, राज्य समन्वयक विभाग वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव, शालेय विद्यार्थ्यी तसेच राज्यातील विविध इंधन वितरक उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.\
राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार – उमेश कुलकर्णी
राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी म्हणाले की, भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाची आजपासून देशभरात सुरुवात होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “Conserve Oil & Gas, Go Green (तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा)” या घोषवाक्यासह हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र व ग्राफिटी स्पर्धा, इंधन-कार्यक्षम वाहनचालक स्पर्धा, लेखन स्पर्धा, दूरदर्शन व रेडिओवरील चर्चासत्रांचे आयोजन. या अभियानादरम्यान शालेय विद्यार्थी, युवक, एलपीजी वापरकर्ते, वाहनचालक, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी, शेतकरी, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचून इंधन संवर्धनाचे महत्त्व, फायदे आणि उपाय योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिलीराज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी इंधन बचतीची शपथ दिली. यावेळी मायरा फाउंडेशनतर्फे इंधन बचतीचे पथनाट्य सादर करण्यात आले.